ममता बॅनर्जी यांचा भाचा अभिषेक बॅनर्जींच्या घरात पोलिसांची पहाटे तीन वाजता छापेमारी...

Foto
कोलकाता  : कोलकाता पोलिसांनी आज (13 जून) पहाटे ३ वाजता ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांच्या कालीघाट येथील निवासस्थानी छापा टाकला. पोलिसांचे पथक सेंट्रल पोलिसांच्या जवानांसोबत आले होते. पोलीस अधिकारी आत शिरले, तर जवान गेटबाहेर पहारा देत उभे होते. ही शोधमोहीम सुमारे चार तास चालली. छाप्याची माहिती मिळताच ममता बॅनर्जी तात्काळ अभिषेकच्या घरी आल्या, थोडा वेळ थांबल्या आणि नंतर निघून गेल्या.

पोलिसांच्या सूत्रांनुसार, अभिषेकचा वैयक्तिक सहाय्यक सुमित रॉय याचा शोध घेण्यासाठी हा छापा टाकण्यात आला होता. सुमितविरुद्ध साल्बोनी पोलीस ठाण्यात "आर्थिक फसवणुकी"प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेव्हापासून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. रॉयचा मोबाईल फोन शेवटचा बॅनर्जी यांच्या कालीघाट येथील निवासस्थानी असल्याचे निष्पन्न झाल्याने हा छापा टाकण्यात आला. अभिषेक यांनी आरोप केला आहे की, पोलीस अधिकाऱ्यांनी घरात जबरदस्तीने प्रवेश करून प्रत्येक खोलीची झडती घेतली. बनावट सही प्रकरणात त्याच्याविरुद्ध सीआयडी तपास सुरू असतानाच हा छापा टाकण्यात आला.

छाप्यात काहीही सापडले नाही, असा टीएमसी खासदार सागरिका घोष यांचा दावा
टीएमसी खासदार सागरिका घोष यांनी 'एक्स'वर लिहिले की, पोलिसांना शोधादरम्यान काहीही सापडले नाही. हा निव्वळ राजकीय सूड, दहशत आणि मानसिक छळ होता. 'ऑपरेशन लोटस' हे भाजपच्या आदेशांपुढे न झुकणाऱ्या सर्व नेत्यांना लक्ष्य करत आहे. हे विरोधी पक्षांविरुद्ध सूडाचे कृत्य आहे. हे घृणास्पद आहे. ही लाजिरवाणी गोष्ट आहे.

अवघ्या 14 दिवसांतच तृणमुलचे दोन तुकडे! 
दुसरीकडे, बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस (टीएमसी) पक्षात फूट निश्चित झाली आहे. विधानसभेच्या 80 आमदारांपैकी 58 आमदारांनी बंड केल्यानंतर आता 19 बंडखोर लोकसभा खासदारांचे एक पत्र समोर आले. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, हे पत्र 18 मे रोजी लोकसभा अध्यक्षांना पाठवण्यात आले असून, त्यात स्वतंत्र गट स्थापन करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावरून हे स्पष्ट होते की, ममता बॅनर्जी यांच्या पराभवानंतर अवघ्या 14 दिवसांतच पक्षांतर्गत बंडाला सुरुवात झाली आहे. या पत्रात युसूफ पठाण, सयोनी घोष, काकोली घोष आणि शताब्दी रॉय यांसारख्या प्रमुख व्यक्तींचा समावेश आहे, परंतु एका व्यक्तीचे नाव उघड करण्यात आलेले नाही. यापूर्वी, 3 जून रोजी, टीएमसीच्या 58 आमदारांनी बंगाल विधानसभेच्या अध्यक्षांना पत्र लिहून आपल्या गटाला मान्यता देण्याची मागणी केली होती, ज्याला अध्यक्षांनी मंजुरी दिली. बंडखोर टीएमसी गट रविवारी दिल्लीत एक बैठक घेणार असून, या बैठकीला पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी हेदेखील उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षांसोबतची बैठक सोमवारी नियोजित आहे.

ममता बॅनर्जी यांच्याकडे आता फक्त 22 आमदार आणि 18 खासदार
टीएमसीचे लोकसभेत एकूण 28 खासदार होते, त्यापैकी 20 जणांमध्ये फूट पडली आहे. आता लोकसभेत ममता बॅनर्जी यांच्याकडे फक्त 8 खासदार उरले आहेत. राज्यसभेत 13 पैकी चार खासदारांनी राजीनामा दिला आहे, म्हणजेच आता फक्त नऊ खासदार उरले आहेत. विधानसभेत या निवडणुकीत टीएमसीने 80 जागा जिंकल्या. यापैकी 58 आमदारांनी वेगवेगळे गट तयार केले आहेत. ममता बॅनर्जी यांच्याकडे फक्त 22 आमदार उरले आहेत.